कै. भाई नेरूरकर चषक खो-खो स्पर्धा
महिला गटात धाराशिव,
किशोरी गटात सांगलीला
विजेतेपद
तर कोल्हापूरला दुहेरी विजेतेपद
इचलकरंजी, दि. 28 मार्च – कै. भाई नेरूरकर चषक राज्य खो-खो स्पर्धेत
कोल्हापूरने पुरुष व किशोर गटात विजेतेपद मिळवित दुहेरी मुकुट पटकावला. सांगलीने
किशोरी गटातून आणि धाराशिवने महिला गटातून चमकदार कामगिरी करीत विजेतेपद मिळवले.
राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा खात्याच्या वतीने
इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथील विठ्ठल रामजी शिंदे शाळा क्रमांक 21च्या मैदानावर ही स्पर्धा पार पडली.
कोल्हापूरचा नाट्यमय विजय
किशोर गटातील अंतिम सामन्यात कोल्हापूरने मध्यंतराच्या 11-10
अश्या एका गुणाच्या आघाडीनंतर उत्तम खेळ करीत सांगलीचा 16-15
असा पराभव केला. कोल्हापूरच्या रुद्र यादव (1.30, 1.20 मिनिटे सरंक्षण), राजवीर वेर्णेकर (5 गडी), आर्यन कुकडे (4 गडी), देवराज यड्रावे (1.30 मिनिटे व
2 गडी) यांनी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.. सांगलीकडून सार्थक
हिरेकुर्ब (2.10 मिनिटे व 5 गडी), सोहम पाडळे (1.00 व 3.00 मिनिटे),
दक्ष जाधव (2.00 मिनिटे व 1 गडी) यांनी यांनी संघाला विजय मिळवून
देण्याचा प्रयत्न केला, पण तो अपुरा ठरला.
सांगलीचा दमदार विजय
किशोरी गटात सांगलीने पुण्याचा 11-8
असा एक डाव राखून 3 गुणांनी पराभव केला. मध्यंतरासच त्यांनी 11-2 अशी निर्णायक
आघाडी घेतली होती. सांगलीच्या अनुष्का तामखडे हिने 2.40 मिनिटे संरक्षण करीत
आक्रमणात 3 गडी बाद करीत अष्टपैलू खेळी केली.
श्रावणी तामखडे (2.30 मिनिटे), वेदिका तामखडे (1.50,2.10 मिनिटे
व 1 गुण) यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पुण्याकडून अपर्णा वर्धे (1.30
मिनिटे), रोहिणी सुलाखे (1.10 मिनिटे व 2 गडी) व पूजा
बिराजदार हिने (1.10 मिनिटे) यांनी झुंज दिली.
धाराशिवकडून पुण्याला धक्का
महिला गटातील अंतिम सामन्यात धाराशिवने पुण्यास 12-10 असे 2
गुण व 4.30 मिनिटे राखून हरविले. मध्यंतरासच धाराशिवने 8-5 अशी 3 गुणाची निर्णायक
आघाडी घेतली होती. संध्या सुरवसे (3.10, 2.10 मिनिटे व 3 गडी), अश्विनी शिंदे (1.00, 2.00 व 3 गडी) व प्रीती काळे (1.20, 1.30 मिनिटे व 1
गडी) हे धाराशिवच्या विजयाचे शिल्पकार ठरले.पुण्याकडून प्रियंका इंगळे (2.00,
1.30 मिनिटे), कृतिका राठोड (3 गडी) व श्वेता
वाघ (1.00, 1.00 मिनिटे व 1 गडी) यांची लढत एकाकी ठरली.
पुरुष गटात कोल्हापूरचा संघर्षपूर्ण सामन्यात निसटता विजय
पुरुषांच्या अंतिम सामन्यात कोल्हापूरने मुंबई उपनगरवर
निर्धारित वेळेतील बरोबरीनंतर जादा डावात 12-11 असा निसटता विजय मिळवला. मध्यंतरास मुंबई उपनगरकडे 11-9 अशी
आघाडी होती. त्यानंतर कोल्हापूरने बहारदार खेळी करीत मुंबई उपनगरला 18-18 असे
बरोबरीत रोखले होते. अर्णव पाटणकर, सौरभ आडावकर, मनोज पाटील, विराज गळतगे, रोहन कोरे आणि श्रीराम कांबळे यांनी कोल्हापूरसाठी जबरदस्त
कामगिरी केली, तर
मुंबई उपनगरकडून प्रतीक देवरे आणि ओंकार सोनवणे यांनी चमकदार खेळी करत
कोल्हापूरच्या तोंडाला फेस आणला होता.
मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विजेत्या संघांना
गौरविण्यात आले. क्रीडामंत्री दत्ता भरणे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर,
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे,
इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील आणि क्रीडा
उपसंचालक माणिक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू
किशोर गट – अष्टपैलू : सार्थक संजय हिरेकुर्ब (सांगली), संरक्षक :
रुद्र उत्तम यादव (कोल्हापूर), आक्रमक : ओजस उमेश बंडगर (कोल्हापूर)
किशोरी गट – अष्टपैलू : अनुष्का आबासो तामखडे (सांगली),संरक्षक :
श्रावणी रामहरी तामखडे (सांगली), आक्रमक : अपर्णा विशाल वर्धे (पुणे)
पुरुष गट – अष्टपैलू : रोहन बापूसो कोरे (कोल्हापूर), संरक्षक : ओमकार
श्रीकांत सोनवणे (मुंबई उपनगर), आक्रमक : सौरभ शिवाजी आडावकर (कोल्हापूर)
महिला गट – अष्टपैलू : अश्विनी आप्पासाहेब शिंदे (धाराशिव), संरक्षक :
संध्या सौदागर सुरवसे (धाराशिव), आक्रमक : प्रियंका हनुमंत इंगळे (पुणे)
Post a Comment
0 Comments