७२व्या वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा
महाराष्ट्राची अंतिम फेरीत दिमाखदार धडक!
उपांत्य फेरीत उत्तर प्रदेशचा ४९-३६ पराभव
अंतिम फेरीकडे झंझावाती वाटचाल
वडोदरा : ७२वी वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा
२०२६ मध्ये महाराष्ट्राच्या पुरुष संघाने दमदार खेळाची पराकाष्ठा गाठत अंतिम
फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. वडोदरा, गुजरात येथे सुरू असलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत उपांत्य
सामन्यात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशचे कडवे आव्हान ४९-३६ असे परतवून लावत
विजयी निशाण रोवले. आता अंतिम फेरीत महाराष्ट्राची गाठ चंदीगड व भारतीय रेल्वे
यांच्यातील विजेत्या संघाशी होणार आहे.
उपांत्य सामन्यात महाराष्ट्राची पकड मजबूत
सामन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्राने आक्रमक भूमिका
घेत उत्तर प्रदेशवर लोण देत १२-७ अशी आघाडी घेतली. विश्रांतीला २८-२२ अशी भक्कम
आघाडी राखून संघाने आपला इरादा स्पष्ट केला. उत्तरार्धात संयम,
रणनीती आणि चपळाई यांचा उत्कृष्ट संगम साधत महाराष्ट्राने
आघाडी कायम राखली. शेवटची ३ मिनिटे शिल्लक असताना ४४-३४ अशी आघाडी महाराष्ट्राकडे
होती आणि विजय जवळजवळ निश्चित झाला होता.
बचाव-आक्रमणाचा परिपूर्ण समतोल
या विजयात असलम इनामदार, आदित्य शिंदे आणि शिवम पाठरे यांच्या संयमी व प्रभावी चढायांनी संघाला भक्कम पाया दिला.
त्याचबरोबर संकेत सावंत आणि जयेश महाजन यांच्या अचूक पकडी व दमदार बचावामुळे उत्तर प्रदेशचा डाव
वारंवार मोडीत निघाला. बचाव आणि आक्रमण यांचा सुरेख समन्वय साधत महाराष्ट्राने
सामना एकतर्फी केला.
उपांत्यपूर्व फेरीत हिमाचलवर दणदणीत विजय
या आधी झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्राने
हिमाचल प्रदेशचा ५३-३८ असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले होते. या
सामन्यात आदित्य शिंदे आणि अजित चौहान यांच्या झंझावाती चढायांनी प्रतिस्पर्ध्यांची पुरती दमछाक
केली. बचावात दादासो पुजारी, संकेत सावंत आणि जयेश महाजन यांनी दिलेली भक्कम साथ हा विजयाचा निर्णायक घटक ठरला.
६८व्या स्पर्धेची आठवण ताजी
जुलै २०२२ मध्ये चरखी, दादरा, हरियाणा येथे झालेल्या ६८व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत
महाराष्ट्राने अशीच अंतिम फेरी गाठली होती. यंदाही संघाने तीच जिद्द,
तोच आत्मविश्वास आणि तितकाच तडाखेबंद खेळ दाखवत इतिहासाची
पुनरावृत्ती केली आहे.
अंतिम लक्ष्य – विजेतेपद!
महाराष्ट्राचा संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून खेळाडूंचा
आत्मविश्वास शिगेला पोहोचला आहे. संतुलित संघरचना, अचूक रणनीती आणि प्रत्येक खेळाडूची झुंजार वृत्ती यामुळे
महाराष्ट्र विजेतेपदाच्या उंबरठ्यावर उभा आहे. आता अंतिम सामन्यातही हीच लय कायम
ठेवत सुवर्णक्षण आपल्या नावावर करण्याचा निर्धार संघाने केला आहे.

Post a Comment
0 Comments