४३वी कुमार-मुली
(ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खोखो स्पर्धा
सलग दहाव्यांदा
महाराष्ट्राला दुहेरी सुवर्ण मुकुट
मुलांचे सलग १९वे, मुलींचे १० वे विजेतेपद.
मुलांचे ३५वे तर
मुलींचे २६वे विजेतेपद
धाराशिवच्या जितेंद्र
वसावेला वीर अभिमन्यू तर सुहानी धोत्रेला जानकी पुरस्कार
अलिगड, दि. २९ नोव्हेंबर, कुमार व मुलींच्या ४३व्या राष्ट्रीय
अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुले व
मुलींच्या संघाने सलग दहाव्यांदा विजेतेपद पटकावित दुहेरी मुकुटाचा मान मिळविला.
अलिगड (उत्तरप्रदेश) येथील
महाराणी अहिल्याबाई होळकर स्पोर्टस् स्टेडियमवर दुहेरी विजेतेपद मिळवताच खेळाडू
व प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. कुमार
गटाचे हे १९ वे तर मुलींचे १० वे सलग
विजेतेपद आहे. या विजयासह महाराष्ट्राच्या कुमारांचे हे एकूण ३५ वे तर मुलींचे २६
वे राष्ट्रीय अजिंक्यपद आहे.
शुक्रवारी झालेल्या या
स्पर्धेतील अंतिम सामन्यात महाराष्ट्राने दोन्ही गटात ओडिसा संघाला नामवित ही
कामगिरी केली. मुलींच्या गटात अश्विनी शिंदेच्या (३.३०, २.३० मि. संरक्षण व २ गुण) अष्टपैलू खेळीमुळे महाराष्ट्राने
ओडिसावर २४-२० असा ४ गुण व ५.१० मिनिटे राखून ओडिसाचा धुव्वा उडवत विजय मिळवला.
मध्यंतरालाच त्यांनी १४-१० अशी चार गुणांची आघाडी घेतली होती. यात अश्विनीला तन्वी
भोसले (२.१० मि. संरक्षण), स्नेहा लामकाने (१.३० मि. संरक्षण),
प्रणाली काळे (१.१० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी साथ दिली. त्यानंतरच्या
डावात ओडिसाच्या संरक्षकांनी शानदार खेळी करीत लढत देण्याचा प्रयत्न केला. परंतु
महाराष्ट्राच्या संरक्षक सुहानी ढोरे (१.२० मि. संरक्षण व ६ गुण) व प्राजक्ता
बिराजदार यांनी (२ मि. संरक्षण) दुसऱ्या डावात बहारदार खेळी करीत विजेतेपदावर
शिक्कामोर्तब केले. सानिका चाफे हिने आपल्या धारदार आक्रमणात पहिल्या डावात व दुसऱ्या
डावात प्रत्येकी चार खेळाडू टिपले. ओडिसाच्या
अर्चना प्रधान (२.०० मि. ४ गुण ), लीसा राणी (१.०० मि. ६
गुण) यांचे प्रयत्न अपुरे पडले.
मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने
ओडीसावर ३३-२९ अशी १.३० मिनिटे राखून मात केली व सलग विजेतेपदाचे दावेदार
महाराष्ट्रच असल्याचे दाखवून दिले. मध्यंतराची १८-१४ ही चार गुणांची आघाडीच महाराष्ट्राला
विजय मिळवून देऊन गेली. महाराष्ट्राच्या विजयात जितेंद्र वसावे (२.३०, १.२० मि. संरक्षण व ४ गुण), कृष्णा
बनसोडे (१.४०, १.४० मि. संरक्षण व ४ गुण) यांच्या अष्टपैलू
खेळाचा समावेश आहे. पार्थ देवकते व प्रेम दळवी यांनी प्रत्येकी सहा गडी बाद करीत विजयात
जोरदार साथ दिली. ओडीसाकडून बापी मुरमु (२.००, १.२० मि. संरक्षण
व २ गुण ), सुनील पात्रा (१.३०, १.०० मि.
संरक्षण व ६ गुण ) यांची लढत अपुरी पडली.
मुलांचे प्रशिक्षक युवराज जाधव
व मुलींचे प्रशिक्षक श्रीकांत गायकवाड यांनी विजयानंतर खेळाडूंनी संघभावनेने खेळ
केल्याचे सांगितले व यासाठी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे पदाधिकारी पूर्णपणे
पाठीशी असल्याने सर्व सुविधा मिळाल्या व विजय सुकर झाल्याचे स्पष्ट केले.
------
सुहानी धोत्रे 'जानकी', जितेंद्र वसावे 'वीर 'अभिमन्यू'चे मानकरी
सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूचा वीर अभिमन्यू पुरस्काराचा जितेंद्र
वसावे हा तर सुहानी धोत्रे ही जानकी पुरस्काराची मानकरी ठरली. हे दोघेही धाराशिवचे
आहेत. अन्य पुरस्काराचे मानकरी : आक्रमक : प्रेम दळवी (सांगली, महाराष्ट्र), लीसा राणी (ओडीसा),
संरक्षक : बापी मुरमु (ओडीसा), तन्वी भोसले
(धाराशिव, महाराष्ट्र).
-----
महाराष्ट्राचे ड्रीम गुणही वसूल
यंदाच्या राष्ट्रीय
स्पर्धेपासून ड्रीम गुण देण्यास सुरुवात झाली. एका तुकडीत तीन खेळाडू असतात. या
तिघांनी मिळून चार मिनिटे संरक्षण केल्यास
एक ड्रीम गुण मिळतो. त्यानंतर प्रत्येक
मिनिटाला ती तुकडी बाद होईपर्यंत एक ड्रीम गुण मिळतो. महाराष्ट्राच्या मुलांनी १ व
मुलींनी ४ गुण वसूल केले. ओडीसाच्या मुलांनीही एक गुण कमावला.
--------
चंद्रजीत जाधव (प्र. कार्यवाह महाराष्ट्र खो-खो असोसिएशन) :
ओडीसाच्या
सरकारने खो-खो सह इतर खेळांना सुध्दा मोठ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्याकडे
खेळाडुंमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी ‘उच्च गुनावात्ता केंद्र’ सुरु केली आहेत.
ओडीसामध्ये खो-खो हा नियमितपणे मॅटवर खेळला जातो. आपल्याकडे अजून अश्या सुविधा
नसताना सुध्दा दोन्ही संघाच्या प्रशिक्षकांनी आपल्या कल्पकतेने, योग्य नियोजन व तांत्रिक
युक्त्या वापरून हे विजय खेळाडू, प्रशिक्षक व व्यवस्थापक यांच्या सांघिक
कामगिरीच्या जोरावर जिंकले आहेत.
--------
मा. अजितदादा पवार (आश्रयदाते - महाराष्ट्र खो-खो असोसिएशन) :
महाराष्ट्राने
राष्ट्रीय कुमार व मुली अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत पुन्हा एकदा अभिमानास्पद कामगिरी
केली आहे. हा विजया खेळाडू, प्रशिक्षक व त्यांच्या पाठीराख्यांचा उत्साह भरभरून
वाढवताना दिसत होता. मुलांनी व मुलींनी अतिशय कल्पक खेळ करून विजयश्री खेचून आणली
आहे. गेले काही दिवस यश माझ्या मागे उभे आहे तेच यश महाराष्ट्राच्या मुला-मुलींनी
पुन्हा एकदा साजरे करण्याची संधी मिळवून दिली. सर्वांना ह्र्दयापासून शुभेच्छा!
--------
Post a Comment
0 Comments