५२ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो
स्पर्धा
सोलापूर, सांगली, पुणे, धाराशिवची दोन्ही गटात दणक्यात सुरुवात
रत्नागिरीच्या मुलींचाही विजयी झेंडा
सोलापूर : नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर उभारण्यात
आलेल्या स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरीत सुरू असलेल्या ५२ व्या कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड
चाचणी खो-खो स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी अनेक संघांनी प्रतिस्पर्ध्यांचा
अक्षरशः धुव्वा उडवत विजयी सलामी दिली. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने
तसेच सोलापूर ॲम्युचर्स खो-खो असोसिएशन आणि किरण स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त
विद्यमाने आयोजित या स्पर्धेत सोलापूर, सांगली, पुणे, धाराशिव यांनी कुमार व मुली दोन्ही गटांत विजयाची नोंद
केली, तर रत्नागिरीच्या
मुली संघाने रायगडवर मात करत स्पर्धेची दमदार सुरुवात केली.
सोलापूरच्या सिद्धार्थ-समर्थच्या अष्टपैलू
खेळीने परभणीचा धुव्वा
कुमार गटातील सामन्यात सोलापूरने परभणीचा ४३-१८ असा एक डाव राखून
धुव्वा उडवला. सोलापूरच्या सिद्धार्थ माने-देशमुख (१.२० मि. संरक्षण व ८
गुण) आणि समर्थ जाधव (२.०० मि. संरक्षण व ८ गुण) यांनी अष्टपैलू
खेळ करत सामन्यावर एकहाती वर्चस्व गाजवले. परभणीकडून शिवराज चिंचवड, कृष्णा पुरोहित, वैभव भालेराव आणि वैजनाथ पोळे यांनी प्रत्येकी
चार गडी बाद करत झुंज दिली; मात्र सोलापूरच्या आक्रमणापुढे त्यांचे प्रयत्न निष्फळ
ठरले.
मुंबईची जळगाववर मात; विघ्नेश-अंश चमकले
दुसऱ्या सामन्यात मुंबईने जळगावचा ३३-२४ असा ६.२० मि. राखून मोठा पराभव
केला. मुंबईच्या विघ्नेश कोरे (२.००, १.३० मि. संरक्षण व ६ गुण) आणि अंश कदम (१.३० मि.
संरक्षण व ६ गुण) यांनी अष्टपैलू खेळ करत विजयात मोलाचा वाटा उचलला.
जळगावच्या आयर्न पवार (नाबाद १, १.३० मि. संरक्षण व ६ गुण) याने एकहाती लढा
दिला; मात्र तो संघाला
विजय मिळवून देऊ शकला नाही.
प्राजक्ता-स्नेहाच्या जोरावर सोलापूरचा बीडवर
डावाने विजय
मुली गटात सोलापूरने बीडचा ४१-१२ असा एक डाव राखून दणदणीत
पराभव केला. प्राजक्ता बनसोडे (२.३९, १.४० मि. संरक्षण व ८ गुण) आणि स्नेहा लामकाने
(३.०५ मि. संरक्षण व ६ गुण) यांनी अप्रतिम अष्टपैलू खेळ करत बीडच्या
बचावफळीची पुरती मोडतोड केली. बीडकडून दुर्गा नाईकनवरे आणि श्रद्धा खारे (१.१० मि. संरक्षण) यांनी प्रत्येकी
दोन गुण मिळवले; मात्र त्या संघाचा पराभव टाळू शकल्या नाहीत.
तन्वी-साक्षीच्या खेळीने रत्नागिरीची विजयी
सलामी
मुलींच्या दुसऱ्या सामन्यात रत्नागिरीने रायगडवर ३०-२६ असा एक डाव राखून
विजय मिळवला. रत्नागिरीच्या तन्वी खानविलकरने १.२० मि. संरक्षण करत ८ गुण मिळवले, तर साक्षी लिंगायतने १.१० मि. संरक्षण करत ६ गडी बाद करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
रायगडकडून प्रज्ञा गाडेने १.५० मि. संरक्षण करत १२ गुण अशी दमदार कामगिरी केली; मात्र तिची झुंज अपुरी ठरली.
कुमार गटात सांगली, पुणे, ठाणे, धाराशिवचा एकतर्फी जलवा
कुमार गटातील अन्य सामन्यांत सांगलीने लातूरचा ४५-६ असा एक डाव राखून धुव्वा
उडवला, धाराशिवने नंदुरबारचा ३९-१२ असा दणदणीत पराभव केला, पुण्याने नांदेडचा ४८-२० असा एक डाव राखून
समाचार घेतला, मुंबई उपनगरने रायगडला ४४-३४ असे ५.२० मि. राखून हरविले, तर ठाण्याने सिंधुदुर्गचा ४९-१२ असा एक डाव राखून
अक्षरशः धुव्वा उडवला.
मुली गटातही विजयांची बरसात; सातारा-ठाणे-धाराशिवचा धडाका
मुली गटात सांगलीने जळगावचा ३३-१६ असा एक डाव राखून पराभव
केला, साताऱ्याने
हिंगोलीचा ३८-४ असा एक डाव राखून धुव्वा उडवला, पुण्याने नांदेडला ४२-१२ असे नमविले, नाशिकने सिंधुदुर्गचा ५४-१० असा एक डाव राखून
दणदणीत पराभव केला, ठाण्याने लातूरचा ५२-१२ असा एक डाव राखून चुराडा केला, तर धाराशिवने छत्रपती संभाजीनगरचा ४८-१० असा एक डाव
राखून धुव्वा उडवत पहिल्याच दिवशी आपला दबदबा सिद्ध केला.







Post a Comment
0 Comments