स्वामी समर्थ श्रीमध्ये महाराष्ट्रातील शरीररसौष्ठवाचे
ग्लॅमर
रविवारी प्रभादेवीत रंगणार राज्यस्तरीय स्पर्धेचा पीळदार थरार
विजेत्यांवर तीन लाखांच्या रोख पुरस्कारांचा वर्षाव
मुंबई, (क्री..प्र.)-
क्रीडा क्षेत्रात आपली ओळख निर्माण करणार्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या
स्वामी समर्थ श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर
शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार
आहे. आमदार महेश सावंत यांच्या कल्पक
आयोजनाखाली प्रभादेवीत दै. सामना शेजारील दत्तू बांदेकर चौकात रविवारी ९ मार्चला
होत असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील एकापेक्षा एक अशा १२५ पेक्षा अधिक
खेळाडूंमध्ये द्वंद्व रंगलेले पाहायला मिळणार आहे.
गेली आठ दशके कबड्डीसह शरीरसौष्ठव खेळात एकापेक्षा एक
स्पर्धांचे आयोजन करण्याबरोबर खेळाडू घडवणार्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने यंदा आपल्या स्पर्धेला भव्य आणि दिव्य
करण्यासाठी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून शरीरसौष्ठवांना स्वामी समर्थ श्री
मध्ये येणार्या आवाहन केले असल्याचे स्पर्धाप्रमुख जयराम शेलार यांनी सांगितले.
त्यामुळे सुमारे सव्वाशे खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविल्याची माहिती महाराष्ट्र
शरीरसौष्ठव संघटनेचे सचिव राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले. सव्वा तीन लाखांच्या
रोख पुरस्कारांचा वर्षाव केला जाणार्या या स्पर्धेत विजेत्याला ५५,५५५ रुपयांचे इनाम दिले जाणार आहे. तसेच उपविजेत्याच्या
मेहनतीलाही प्रोत्साहन म्हणून २२,२२२ रुपयांचा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. ही
स्पर्धा ५५, ६०,
६५, ७०,
७५, ८० आणि ८० किलोवरील अशा एकंदर सात गटात खेळली जाणार असून प्रत्येक गटात अव्वल
तीन खेळाडूंना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकासह पहिल्या पाच खेळाडूंना १०,
८, ६,
४ आणि ३ हजार अशी रोख रकमेची बक्षीसेही दिली जातील.
महिला आणि दिव्यांगाचीही स्पर्धा
राज्यातील शरीरसौष्ठवपटूंच्या थराराबरोबर महिलांच्या
शरीरसौष्ठव स्पर्धेचाही एक गट या स्पर्धेत खेळविला जाणार आहे. यातही राज्यातील
अव्वल महिला शरीरसौष्ठवांचा सहभाग निश्चित असल्याची माहिती राजेंद्र चव्हाण यांनी दिली. एवढेच नव्हे तर दिव्यांगाच्या
शरीरसौष्ठव स्पर्धेलाही प्रोत्साहन दिले जाणार आहे.
स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने या स्पर्धेची भव्यता
वाढविण्यासाठी महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा घेतली
आहे. या स्पर्धेत भारत श्री स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करणारे शशांक वाकडे (मुंबई),
विश्वनाथ बकाली (सांगली), रामा मायनाक (सातारा), नितीन म्हात्रे (पश्चिम ठाणे),
रोशन नाईक (पालघर) या दिग्गजांसह अर्शद मेवेकरी (सांगली),
ओंकार नलावडे (पुणे), पंचाक्षरी लोणार (सोलापूर), संतोष शुक्ला (ठाणे), नीलेश खेडेकरसारखे (मुंबई) तयारीतले खेळाडू आपल्या पीळदार
देहयष्टीची किमया दाखविणार आहेत. प्रभादेवीत अनेक वर्षांनतर राज्यस्तरीय ग्लॅमर
असलेली मोठी स्पर्धा होतेय, ज्यात महाराष्ट्र शरीरसौष्ठवाची खरी पीळदार श्रीमंती मुंबईकरांना पाहायला
मिळेल. प्रत्येक गटात गटविजेतेपदासाठी प्रचंड संघर्ष होणार असल्यामुळे स्वामी
समर्थ श्री ग्लॅमरस आणि संस्मरणीय होणार हे निश्चित आहे. स्पर्धेच्या अधिक
माहितीसाठी राजेंद्र चव्हाण (९८७००२३२३५), राज यादव (९६१९४७७२५१), राजेंद्र गुप्ता (९८२०७६७४०३) यांच्याशी संपर्क साधण्याचे
आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments