ठाणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी
स्पर्धा – २०२६
महिलांत किल्ले माऊली, नवतरुण, जय भारत तर
पुरुषांत छत्रपती शिवाजी, स्वामी विवेकानंद तिसऱ्या फेरीत!
खारलँड मैदानावर कबड्डीचा रंगतदार थरार
ठाणे : ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने आणि ऍडव्होकेट सौ.
पूजा राजा ठाकूर यांच्या सहकार्याने आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा –
२०२६ मध्ये सुरुवातीपासूनच रोमांचक सामने रंगले. कळवा, खारेगाव, ठाणे (प.) येथील खारलँड मैदान, सह्याद्री हायस्कूलसमोरील मैदानावर सुरू झालेल्या
या स्पर्धेत महिलांच्या गटात किल्ले माऊली, नवतरुण, जय भारत, तर पुरुषांच्या गटात छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद या संघांनी दमदार खेळ करत तिसरी फेरी गाठली.
महिलांत किल्ले माऊलीचा ५५–१८ असा दणदणीत विजय
महिलांच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात किल्ले माऊली संघाने राहुल मंडळ संघावर ५५–१८ असा एकतर्फी विजय मिळवत तिसऱ्या फेरीत प्रवेश
केला. सामन्याच्या सुरुवातीलाच २ लोण देत किल्ले माऊलीने पूर्वार्धात २९–११ अशी भक्कम आघाडी
घेतली. उत्तरार्धातही त्याच जोमाने खेळ करत आणखी २ लोण देत संघाने गुणांचे अर्धशतक पार केले. या विजयात मयुरी जोशी, मयुरी शेलार आणि संजना विशे यांच्या चढाई व पकडीतील झंझावाती कामगिरीचा मोठा
वाटा राहिला.
नवतरुणचा थरारक २५–२४ विजय
दुसऱ्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात नवतरुण मंडळ संघाने मध्यंतरातील ०८–१३ अशा पिछाडीवरून शानदार पुनरागमन करत शिवतेज संघावर २५–२४ अशी निसटती मात
केली. वैभवी कासार आणि रिबीका गावीत यांच्या आक्रमक खेळामुळे शिवतेज संघाला
विश्रांतीला आघाडी मिळाली होती. मात्र उत्तरार्धात संयमी यादव आणि भाविका यांनी तुफानी खेळ करत नवतरुण संघाला विजय मिळवून
देत तिसऱ्या फेरीत पोहोचवले.
जय भारतचा ४५–२० विजय; तिसऱ्या फेरीत आगेकूच
महिलांच्या शेवटच्या सामन्यात जय भारत संघाने स्व. राकेशदादा म्हात्रे संघावर ४५–२० असा ठोस विजय
मिळवत तिसरी फेरी गाठली. सामन्यातील आक्रमक चढाया आणि भक्कम बचावाच्या जोरावर जय
भारतने प्रतिस्पर्ध्यांवर पूर्ण नियंत्रण ठेवले.
पुरुषांत छत्रपती शिवाजी महाराजचा ३९–१३ विजय
पुरुषांच्या दुसऱ्या फेरीत छत्रपती शिवाजी महाराज संघाने नवरत्न मंडळावर ३९–१३ असा दणदणीत विजय मिळवला. पूर्वार्धात २५–०३ अशी भक्कम आघाडी
घेतल्यानंतर उत्तरार्धात सावध खेळ करत त्यांनी सामना सहज जिंकला. या विजयात वेदान्त नायक, ओमकार मोरे आणि तन्मय परब यांनी चतुरस्त्र खेळ करत संघाच्या विजयात मोलाचा
वाटा उचलला. नवरत्न संघाचा देवराज बने मात्र उल्लेखनीय खेळ करताना दिसला.
स्वामी विवेकानंदचा २८–१२ विजय
दुसऱ्या सामन्यात स्वामी विवेकानंद संघाने राज मंडळाचा प्रतिकार २८–१२ असा मोडीत काढत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
पहिल्या डावातच १४–०४ अशी आघाडी घेत विवेकानंद संघाने सामन्यावर
नियंत्रण मिळवले. या विजयात यश पाटील आणि कुणाल पानसरे यांनी चमकदार खेळ सादर केला.
पूजा राजा ठाकूर यांच्या हस्ते स्पर्धेचे
उद्घाटन
या स्पर्धेचे उद्घाटन ऍडव्होकेट सौ. पूजा राजा ठाकूर यांच्या हस्ते
पार पडले. ठाणे जिल्ह्यातील विविध भागांतून सहभागी झालेल्या संघांमुळे स्पर्धेत
मोठी रंगत निर्माण झाली असून पुढील फेऱ्यांमध्ये आणखी चुरशीचे सामने पाहायला
मिळणार आहेत. कबड्डीप्रेमींसाठी ही स्पर्धा खऱ्या अर्थाने क्रीडा मेजवानी ठरत आहे.

Post a Comment
0 Comments